Thursday, July 15, 2010

स्वार्थ

माणसाला स्वत:चे वर्णन ऐकायला फार आवडते. देहभान विसरुन माणुस स्वत:चे वर्णन ऐकत असतो. वर्णन करणारेही पुष्कळ असतात. आपणास एखाद्याकडून काही प्राप्ती होणार आहे असे कळले, की माणूस त्यांचे वर्णन करतोच. पण त्या वर्णनात यथार्थता असतेच असे नाही. वर्णन दोन प्रकारचे असते , एक यथार्थ अणि दुसरे अयथार्थ! यथार्थ वर्णन ज्ञानातुन होते अणि अयथार्थ वर्णन गरजेतून ! वर्नन करणे हा जरी अनेकांचा स्वभाव असला, तरी ते वर्णन योग्य असेलच असे नाही. पूर्वीच्याकाळी राजेमहाराजे आपल्या दरबारी स्तुतीपाठक ठेवत असेत. राजाचे वर्णन वस्तुस्थितीला धरुन केलेले असेलच असे नाही. आजही पैसे देऊन स्वत:चे वर्णन करवून घेणारे लोक आहेतच.
वर्णनाचे मूल्य; कोणाचे वर्णन केले जाते, वर्णन करणारा कोण अणि वर्णनाचा विषय यावर ठरत असते. काही तरी गुण असल्याशिवाय वर्णन होत नाही. ज्याचे वर्णन करायचे, तो खरोखरच गुणवान आहे का? याचा विचार केला पाहिजे. दुसरे वर्णन करणारा कोण आहे याचेही चिंतन केले पाहिजे. कारण एखादा भिकारी रुपया भीक देणार्याचे "कर्णाचा अवतार" म्हणून वर्ण करतो. भिकारी एखाद्याचे वर्णन करतो याला मूल्य नाही. एखादा श्रीमंत श्रीमंताचे वर्णन दानशुर असे करतो याला मुल्य आहे. कारण ते ओळखुन जाणीवपुर्वक केलेले आहे. आपण ज्ञानेश्वरमहाराजांचे वर्णन करतो यातुन त्यांचे मोठेपण सिध्द होत नाही. नामदेवमहाराज, तुकाराममहाराज त्यांचे जे वर्णन करतात, त्यातून त्यांचा मोठेपणा कळतो... म्हणुन वर्णन करणारा कोण आहे हे पाहिले पाहिजे अणि तिसरे, वर्णनाचा विषय काय, यावरुनही त्याचे मूल्य ठरते. सदगुणांचे वर्णन झाले तर योग्य अन्यथा ‘अमुक अमुक चोरी फार सफाईने करतो...’ असे वर्णन योग्य नाही! वर्णन सदगुणाचेच असावे. तरते महत्वाचे ठरते. पण सध्याची स्थिती वेगळीच आहे. वर्णनासाठी आवश्यक या तीनही गोष्टींचा विचार सध्या होत नाही. सुभाषिताने गमतीने म्हटले आहे.

उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गदर्भा: ।
परस्परं प्रशंसन्ति अहो रुपं अहो ध्वनि: ॥

( उंटाच्या लग्नात गाढवाने गायन केले. दोघांनी एकमेकांच्या रुपाची व आवाजाची प्रशंसा केली. उंटाचे रुप , गाढवाचा आवाज...!! सध्या असेच नाही का? )

Thursday, July 1, 2010

कालगती

कालगती अखंड आहे. तो काळ थांबत नाही. थांबलाच तर तो काळ नाही. काळावर मात करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, पण ते अशक्य आहे. महाभारतामध्ये संजयाच्या मुखामध्ये एक वचन आहे

काल: सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रम: ।
काल: सर्वेषु भुतेषु चरत्यविधुत: सम: ॥

काळावर मात करणे कठीण आहे. काळाची सत्ता अगाध आहे. रामकृष्णदिक अवतारांनाही त्या काळाच्या सत्ते वागावे लागते. ‘जगा काळ खाय । आम्ही माथा दिला पाय ॥’ म्हणणारे श्री तुकारन महाराजांसारखे संतच असु शकतात. काळाच्या पलीकडे जाण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. भतृहरीनेही वैराग्यशतकामध्ये काळाचे माहात्म ओळखून त्याला नमस्कार केला आहे.

‘सर्वं यस्य वशाद्‌गारुत्स्मृतिपंथ कालाय तस्मैं नम: ।’

प्रवाहाच्या विरुध्द वागणे अथवा पोहणे हे मानवाच्या शक्यतेच्या कोटीतील गोष्ट नव्हे. जरी त्याने तसा प्रयत्न केला, तर कालांतराने त्याच्या हे लक्षात येइल की या प्रयत्नात काळ खुप गेला पण हात रिकामेच राहिले. त्यामुळे त्याला विरोध करण्यापेक्षा त्याचा योग्य तो उपयोग करुन घेणे हेच शहाणपणाचे आहे. कोणतेही कर्म चालू असताना काळाचे गणित अखंड चालू असले म्हणजे काळाचा योग्य उपयोग होइल. योग्य काळाचा योग्य उपयोग झाला पाहिजे. कुमारसंभवात म्हटले आहे,

निर्वाणदीपे किमु तैलदानम चौरे गते वा किमु सावधानम्‌ ।
वयोगते किं वनिताविलास: पयोगते किं खलु सेतुबन्ध: ॥

दिवा शांत झाल्यावर तेलाचा काय उपयोग? चोरी झाल्यावर सावध हो ऊन काय उपयोग? वय झाल्यावर विलास काय कामाचा? पाणी गेल्यावर सेतु बांधून किंवा पाळ करुन काय उपयोग?
त्याचप्रमाणे काळ गेल्यानंतर विचार करुन काय उपयोग?
सावध !! सावध !! सावध !!