Monday, July 26, 2010
Thursday, July 15, 2010
स्वार्थ
माणसाला स्वत:चे वर्णन ऐकायला फार आवडते. देहभान विसरुन माणुस स्वत:चे वर्णन ऐकत असतो. वर्णन करणारेही पुष्कळ असतात. आपणास एखाद्याकडून काही प्राप्ती होणार आहे असे कळले, की माणूस त्यांचे वर्णन करतोच. पण त्या वर्णनात यथार्थता असतेच असे नाही. वर्णन दोन प्रकारचे असते , एक यथार्थ अणि दुसरे अयथार्थ! यथार्थ वर्णन ज्ञानातुन होते अणि अयथार्थ वर्णन गरजेतून ! वर्नन करणे हा जरी अनेकांचा स्वभाव असला, तरी ते वर्णन योग्य असेलच असे नाही. पूर्वीच्याकाळी राजेमहाराजे आपल्या दरबारी स्तुतीपाठक ठेवत असेत. राजाचे वर्णन वस्तुस्थितीला धरुन केलेले असेलच असे नाही. आजही पैसे देऊन स्वत:चे वर्णन करवून घेणारे लोक आहेतच.
वर्णनाचे मूल्य; कोणाचे वर्णन केले जाते, वर्णन करणारा कोण अणि वर्णनाचा विषय यावर ठरत असते. काही तरी गुण असल्याशिवाय वर्णन होत नाही. ज्याचे वर्णन करायचे, तो खरोखरच गुणवान आहे का? याचा विचार केला पाहिजे. दुसरे वर्णन करणारा कोण आहे याचेही चिंतन केले पाहिजे. कारण एखादा भिकारी रुपया भीक देणार्याचे "कर्णाचा अवतार" म्हणून वर्ण करतो. भिकारी एखाद्याचे वर्णन करतो याला मूल्य नाही. एखादा श्रीमंत श्रीमंताचे वर्णन दानशुर असे करतो याला मुल्य आहे. कारण ते ओळखुन जाणीवपुर्वक केलेले आहे. आपण ज्ञानेश्वरमहाराजांचे वर्णन करतो यातुन त्यांचे मोठेपण सिध्द होत नाही. नामदेवमहाराज, तुकाराममहाराज त्यांचे जे वर्णन करतात, त्यातून त्यांचा मोठेपणा कळतो... म्हणुन वर्णन करणारा कोण आहे हे पाहिले पाहिजे अणि तिसरे, वर्णनाचा विषय काय, यावरुनही त्याचे मूल्य ठरते. सदगुणांचे वर्णन झाले तर योग्य अन्यथा ‘अमुक अमुक चोरी फार सफाईने करतो...’ असे वर्णन योग्य नाही! वर्णन सदगुणाचेच असावे. तरते महत्वाचे ठरते. पण सध्याची स्थिती वेगळीच आहे. वर्णनासाठी आवश्यक या तीनही गोष्टींचा विचार सध्या होत नाही. सुभाषिताने गमतीने म्हटले आहे.
उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गदर्भा: ।
परस्परं प्रशंसन्ति अहो रुपं अहो ध्वनि: ॥
( उंटाच्या लग्नात गाढवाने गायन केले. दोघांनी एकमेकांच्या रुपाची व आवाजाची प्रशंसा केली. उंटाचे रुप , गाढवाचा आवाज...!! सध्या असेच नाही का? )
Tuesday, July 6, 2010
Thursday, July 1, 2010
कालगती
कालगती अखंड आहे. तो काळ थांबत नाही. थांबलाच तर तो काळ नाही. काळावर मात करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, पण ते अशक्य आहे. महाभारतामध्ये संजयाच्या मुखामध्ये एक वचन आहे
काल: सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रम: ।
काल: सर्वेषु भुतेषु चरत्यविधुत: सम: ॥
काळावर मात करणे कठीण आहे. काळाची सत्ता अगाध आहे. रामकृष्णदिक अवतारांनाही त्या काळाच्या सत्ते वागावे लागते. ‘जगा काळ खाय । आम्ही माथा दिला पाय ॥’ म्हणणारे श्री तुकारन महाराजांसारखे संतच असु शकतात. काळाच्या पलीकडे जाण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. भतृहरीनेही वैराग्यशतकामध्ये काळाचे माहात्म ओळखून त्याला नमस्कार केला आहे.
‘सर्वं यस्य वशाद्गारुत्स्मृतिपंथ कालाय तस्मैं नम: ।’
प्रवाहाच्या विरुध्द वागणे अथवा पोहणे हे मानवाच्या शक्यतेच्या कोटीतील गोष्ट नव्हे. जरी त्याने तसा प्रयत्न केला, तर कालांतराने त्याच्या हे लक्षात येइल की या प्रयत्नात काळ खुप गेला पण हात रिकामेच राहिले. त्यामुळे त्याला विरोध करण्यापेक्षा त्याचा योग्य तो उपयोग करुन घेणे हेच शहाणपणाचे आहे. कोणतेही कर्म चालू असताना काळाचे गणित अखंड चालू असले म्हणजे काळाचा योग्य उपयोग होइल. योग्य काळाचा योग्य उपयोग झाला पाहिजे. कुमारसंभवात म्हटले आहे,
निर्वाणदीपे किमु तैलदानम चौरे गते वा किमु सावधानम् ।
वयोगते किं वनिताविलास: पयोगते किं खलु सेतुबन्ध: ॥
दिवा शांत झाल्यावर तेलाचा काय उपयोग? चोरी झाल्यावर सावध हो ऊन काय उपयोग? वय झाल्यावर विलास काय कामाचा? पाणी गेल्यावर सेतु बांधून किंवा पाळ करुन काय उपयोग?
त्याचप्रमाणे काळ गेल्यानंतर विचार करुन काय उपयोग?
सावध !! सावध !! सावध !!
Wednesday, June 23, 2010
Tuesday, June 22, 2010
साध्य
जगात तीन प्रकारचे लोक जन्माला येतात. एक, जन्माला येतात अणि काही विशिष्ठ साध्य प्राप्त न घेता तसेच मरतात. दोन, जन्माला येऊन काही साध्य ठरवितात अणि प्रयत्नपूर्वक त्याची प्राप्ती करुन घेतात. तीन, साध्य ठरवूनच जन्माला येतात.
पहिला प्रकार हा अज्ञानी जीवांचा आहे. हे केवळ कर्म आहे म्हणून जन्माला येतात. त्यांना काही ज्ञान उद्दिष्ट साध्य ठरवता येत नाहीत. केवळ आयुष्य आहे म्हणून जिवंत राहतात. किड्या मुंग्यांचे , गाढव वगैरे प्राण्यांना जसे जीवन तसेच यांचे जीवन. दुसरा प्रकार हा साधकाचा आहे. जन्माला आल्यानंतर बुध्दीच्या मर्यादेमध्ये जे साध्य त्यांना योग्य वाटते, ते डोळ्यासमोर ठेवतात अणि प्रयत्नपूर्वक ते प्राप्तही करुन घेतात. प्रत्येकाची आवड, क्षमता, मर्यादा , संस्कार, यावर प्रत्येकाचे साध्य अवलंबून असले. ते आपापल्या परीने ते प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्न करीत असतात. अनि हा तिसरा वर्ग संतांचा आहे. ते साध्य ठरवूनच येत असतात. एखादा सरकारी अधिकारी एखाद्या ठिकाणी बदली हो ऊन आला तर त्याला नोकरी, घर वगैरेची चिंता नसते. त्याचे सर्व तयार असते. त्याप्रमाणे संतांचे सर्व तयार असते. कोठे जन्माला यायचे, काय व कसे करायचे हा सर्व विचार ठरलेला असतो. त्यांना सर्व प्राप्त झालेले असते. यावर कोणी म्हणेल, जर त्यांचे सर्व तयार असते तर, तर जन्माला येण्याची गरज काय? कारण ते स्वत:साठी जन्माला येतच नसतात, त्यांचा जन्म आपल्यासाठी असतो. सर्व विश्वाच्या कल्याण्यासाठी संतांचा अवतार असतो. आपले साध्य कसे असावे , आपले जीवन इतरांसाठी खर्च कसे करावे याचा आदर्श लोकांसमोर निर्माण व्हावा म्हणून ते साध्य-साधनाचा विचार सांगतात. तसे साध्य आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. ते मोठेपणाचे !
अयं निज: परोवित गणना लघुचेतसाम।
उदार चरितणांतु वसुधैव कुटुम्बकम॥
Friday, June 18, 2010
विचार
एका मानसशास्त्रज्ञाने असे म्हटले आहे की माणसाने दोन गोष्टींचा विचार नेहमी करावा, आपल्याला काय करायचे आहे; अणि आपण काय करतो आहोत. यातून आपल्या उद्दिष्टांचा विचार माणसाच्या मनात कायम राहतो. त्याचा विसर पडत नाही. दुसरे, आपण वर्तमानातही जगतो, वर्तमानाचाही विचार केला जातो.व्याकरणाच्या दृष्टीने काळ तीन प्रकारचा आहे.अणि या तीनही काळाचा मानवी जीवनाशी संबंध आहे. माणूस केवळ एका काळात जगू शकत नाही. केवळ भूतकाळात तो रमला तर त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल होणार नाही. पण त्याचबरोबर तो भूतकाळ संपूर्णत: विसरुही शकत नाही. केवळ वर्तमानातही तो जगू शकत नाही. जरी कोणी वर्तमानात जगा म्हणून सांगत असेल तरई विचारी माणूस नेहमीच वर्तमानात जगणार नाही. त्याला भविष्यावर दृष्टी ठेवावीच लागेल. कारण वर्तमानकाळातील परिणाम भविष्यकाळातच आकाराला येतील अणि विचारी मनुष्य परिणामाचा विचार नक्कीच करेल.केवळ भविष्यकाळाच्या चिंतनात तो रमणार नाही. केवळ भविष्याचा विचार म्हणजे ते कदाचित स्वप्न ठरेल. विचारी माणसाच्या बाबतीत हे संभवणारच नाही.विचारवान मनुष्य तीनही काळाचा विचार करीत असतो. किंबहुना तीनही काळाचा विचार करतो त्यालाच विचारी म्हणतात. भूतकाळाचे स्मरण , वर्तमानाची जाणीव अणि भविष्याचे चिंतन यालाच विचार म्हणतात. अणि तसे झालेच तरच आपले उद्दिष्ट आपणास प्राप्त होईल. भूतकाळाच्या स्मरणाने वर्तमान निश्चित होईल अणि वर्तमानाच्या जाणिवेने भविष्य उज्ज्वल होईल. हा विचारच मानवाला समाधान देईल. म्हणून विचारवंतांनी किंवा संतमहात्म्यांनी विचार करा म्हणून सांगितले आहे. श्री तुकाराम महाराज म्हणतात -
विचारावाचून । न पाविजे समाधान ॥
विचारावाचून । न पाविजे समाधान ॥
Friday, June 11, 2010
विवेक
विवेक हा माणसाला अपेक्षित पण दुर्लभ असा गुण आहे. माणसाचे सर्व म्हणजे सांसारिक अणि पारमार्थिक जीवनाचा विवेक म्हणजे पाया आहे. मानवाचे लौकिक जीवनही यावरच आधारित आहे. विवेक म्हणजे चांगल्या-वाईटाचा निवाडा! खऱ्या-खोट्याचा निवाडा करणे कठीण असते, व ती नित्याच्या जीवनातील आवश्यक गोष्ट आहे.जग खऱ्याखोट्याचे मिश्रण आहे. श्रीशंकराचार्यांनी अध्यासभाष्यामध्ये ‘सत्यानृते मिथुनीकृत्य’ असे म्हटले आहे. खरे अणि खोटे नेहमीच साध्या दृष्टीने कळतेच असे नाही. बऱ्याच वेळा खोटे हे खऱ्याचे रुप घेऊन येते. त्यासाठी सामन्य दृष्टी उपयोगाला येत नाही. तेथे विचात, ज्ञान आवश्यक असते. सूक्ष्म दृष्टीलाच खऱ्या-खोट्याचा भेद कळतो. ती दृष्टी म्हणजेच विवेक !तो विवेक सर्वांकडे असतोच असे नाही. ती दृष्टी प्राप्त झाली की पुन्हा दु:खाचा प्रसंग प्राप्त होत नाही. विवेकाने मनुष्य काम, क्रोध , लोभात अडकत नाही. योगवसिष्ठात म्हटले आहे,न तदस्ति विमोहाय यव्दिविक्तस्य चेतस: ।कारण खऱ्याखोट्याचे, नित्यनित्याचे, योग्य-अयोग्य ज्ञान झाल्यानंतर खोट्याकडे, अनित्याकडे, अयोग्याकडे मनुष्य प्रवृत्त होत नाही. पण एवढ्यावरच विवेकाचा विचार संपत नाही. कारण केवळ खरे-खोटे तथा अर्थाने सर्वच जाणतात. खरे-खोटे जाणून खऱ्याचा स्वीकार अणि खोट्याचा त्याग याचे नाव विवेक !हे सर्वांना जमत नाही. दूध पातळ असले म्हणजे दूधात पाणी आहे हे सर्वजण ओळखतात पण दूध अणि पाणी वेगळे करुन केवळ दूध ग्रहण मात्र फक्त राजहंसच असतो. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलयं,
सलिली पय जैसे । एक होऊनि मिनले असे ।ते निवडूनि राजहंसे । वेगळे कीजे ॥
सलिली पय जैसे । एक होऊनि मिनले असे ।ते निवडूनि राजहंसे । वेगळे कीजे ॥
संत-संग
मानवी जीवन हे संगप्रधान आहे. प्रत्येकाला कोणाचा ना कोणाचा संग अपेक्षित आहे. संगरहित जीवनाची माणूस कल्पनाही करु शकत नाही. एकट्याने राहणे मानवाला शक्य नाही म्हणून तुरुंगवासाची कल्पना अस्तित्वात आली.त्या संगासाठी माणूस काय करेल हे सांगताही येणार नाही. केवळ माणसानेच नव्हे तर तात्विक दृष्टीने विचार केला तर ब्रह्मालाही एकट्याने करमले नाही. ‘स एकाकी न रमते’ असे उपनिषिदही म्हणते. म्हणून ब्रह्मच जगद्रूपाने नटले. म्ह्णजे ब्रह्मालाही एकट्याला राहणे जमले नाही. म्हणजे प्रत्येकालाच संगाची अपेक्षा आहे. आपल्यामध्ये जे कमी आहे, त्याची भरपाई जेथून होते त्याचा संग करणे मानसाला आवडते.मग तो जीव असो, जड असो, देव असो अथवा संत असो. त्याची संगत माणसाला घडते अणि त्या सम्गतीवर त्याचे आयुष्य ठरते. जर संगती जडाची, जीवाची असेल तर त्याला बरेचसे दु:खच प्राप्त होते, पण संतांची अणि देवाची संगत घडली तर मात्र त्याला सुख अणि सुखरुपता प्राप्त होते. मानवाच्या पारमार्थिक जीवनामध्ये संतसंग हा अत्यंत महत्वाचा अणि आवश्यक मानला आहे. देवाचा संग जीवला नेहमीच आहे, संतांचा संग मात्र दुर्लभ आहे.
Saturday, May 29, 2010
कीर्तन: चैतन्य महाराज देगलुरकर | स्थळ: २१२ नाथषष्ठी महोत्सव,लातूर
पक्षी अंगणी उतरती
ते का गुंतोनिया राहती
तैसे असावे संसारी
जोवरी प्राचिनाची दोरी
वस्तीकर वस्ती आला
प्रात:काळी उठोनी गेला
तैसे असावे संसारी
जोवरी प्राचिनाची दोरी
एका जनार्दनी शरण
ऐसे असता भय कवण
तैसे असावे संसारी
जोवरी प्राचिनाची दोरी
Subscribe to:
Comments (Atom)
